‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘पिंजरा’ मधील नायिका आनंदी आणि नायक वीर यांचा साखरपुडा अखेर संपन्न झाला. असं म्हणतात की खऱ्या प्रेमाचा विजय होतोच. वीर आणि आनंदीच्या बाबतीत अखेर हेच झाले. अक्का- नारायणी यांनी केलेली असंख्य कारस्थाने, नारायाणीने आखलेले कट त्याचबरोबर इतर अनेक प्रकारच्या संकटातून, गैरसमजातून या  दोघांचे  एकमेकांबद्दलचे प्रेम टिकून राहिले आणि दोघांचा साखरपुडा संपन्न  झाला.

या  शुभकार्यामध्ये  विघ्न  आणण्याचा  पुरेपूर  प्रयत्न  होईल  याची  आनंदी  आणि वीर या  दोघांनाही  कल्पना  होती आणि म्हणूनच  दोघेही  अत्यंत  सावध  होते. नारायणीने यावेळीही साखरपुड्याची अंगठी लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण नारायणीबरोबरच वीर–आनंदीचं लग्न एकदा मोडून वीरचं नारायणीशी फसवणुकीने लग्न  लावणारी अक्का या दोघींवरही सर्वांचा संशय होता. म्हणूनच वीर – आनंदीसह तात्या, गोरख शालिनी, पंढरी हे सर्वजण या दोघींवर बारीक लक्ष ठेवून होते. त्यामुळेच या दोघींचे कोणतेही कारस्थान यावेळी यशस्वी झाले नाही. म्हणूनच सर्व अडचणींवर मात करीत वीर आणि आनंदीचा साखरपुडा शेलार वाड्यात अखेर संपन्न झाला. आता प्रतीक्षा आहे, ही जोडी विवाहाच्या रेशीमगाठीत कधी  बांधली जाते याची !

गुरुवार दिनांक १ डिसेंबर रोजी ‘झी मराठी’वर झालेल्या साखरपुड्याच्या या मनोहारी सोहळ्याने प्रेक्षकांनाही आनंदाची पर्वणीच मिळाली.